गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) जि. सातारा या प्रकल्पाचे जलपूजन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. यावेळी आंधळी धरणातील या प्रकल्पाची होडीतून पाहणी केली. याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले जी, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर जी, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. राहुल कुल, सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
कित्येक दशकांपासून थेंब थेंब पाण्यासाठी तहानलेल्या भूमीत आज पाणी पोहोचले व या पाण्याचे जलपूजन कारण्याची संधी मिळाल्याचे मला समाधान आहे.
या पाण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी मोठा संघर्ष केला. मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळही दूर करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले.
22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवशी आंधळीच्या धरणात पाणी पोहोचले.
हा अत्यंत चांगला योगायोग असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे. प्रकल्पातून 15,170 हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे. याचा लाभ 27 गावांना मिळणार आहे.
3.17 अब्ज घनफूट पाणी कृष्णा नदीतून उचलून खटाव आणि माण तालुक्यात आणले जात असून एकूण 27,500 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता देऊन ₹1331 कोटींची योजना मंजूर केली.
गेल्या दीड वर्षात सरकारने 121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून 15 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. या योजनांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. पूर्वी राज्यकर्ते लोकांना पाण्यासाठी झुंजवत ठेवत होते व निवडणुकीच्या काळात त्या मुद्द्यावरून मत मागत होते. मात्र आमचे सरकार लोकांना पाणी देते व त्यानंतर त्यांचे आशीर्वाद मागते आणि जो पाणी देतो त्यांना जनता नेहमीच आशीर्वाद देते !